नरवीर बहिर्जी नाईक यांच्या समाधीस्थळाचा पर्यटनदृट्या होणार विकास – आदित्य ठाकरे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे नेतृत्व करणारे नरवीर बहिर्जी नाईक यांच्या बाणुरगड ता. खानापूर, जि. सांगली येथील समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल अशी माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेली आहे.
मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, शिवरायांचा इतिहास आणि त्यांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्याचपद्धतीने शिवरायांसाठी कार्य करणाऱ्या मावळ्यांचा इतिहासही प्रेरणादायी आहे. नरवीर बहिर्जी नाईक यांनी गुप्तहेरीमधील आपल्या कौशल्याने स्वराज्य स्थापनेत महत्त्वाचे योगदान दिले. त्यांचे कार्य जगासमोर येण्याच्या दृष्टीने तसेच त्यांच्या कार्यातून सर्वांना प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचे समाधीस्थळ असलेल्या भागाचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगिण विकास केला जाईल, असे ते म्हणाले.
स्थानिक आमदार अनिल बाबर यांनी बुधवारी मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन त्यांना सादर केले. त्याची तातडीने दखल घेऊन बाणुरगड येथील समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगिण विकास केला जाईल, असे मंत्री ठाकरे यांनी सांगितले.