कालांतराने सुजय विखे पाटील यांना राष्ट्र्वादीने जागा न सोडल्यामुळे ना इलाजाने त्यांनी भाजपा पक्षात प्रवेश करून नगर मतदारसंघातून भाजपा कडून उमेदवारी मिळवली तर राष्ट्र्वादीने या जागेवरून संग्राम जगताप यांना उमेदवार दिलेली होती. निवडणुकीचा प्रचार चालू झाल्यापासूनच या जागेवर प्रतिस्पर्धीचे एकमेकांशी खटके उडताना दिसत आहे. तसेच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी नगर मध्ये सभा घेऊन गेले आहेत.
सुजय विखे पाटील यांनी जगताप यांच्यावर टीका करताना बोलून दाखविले की, राष्ट्रवादीचा उमेदवार गेल्या साडेचार वर्षात आमदार असून प्रश्न मांडू शकला नाही. सिव्हिल हडकोमधील म्हाडाचे प्रश्न मुंबई म्हाडामध्ये एकदा तरी मांडले का हे दाखवून द्यावे. कारण त्यांचा प्रवास फक्त आमरधाम ते तोफखाना एवढाच आहे. हा उमेदवार आमदार विधानसभेत फक्त चार मिनिट बोलला आणि त्याचे वडील विधान परिषदेत आठ वर्षात एक शब्द बोलले नाही, असा घणाघाती आरोप युतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी केला. यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड, अॅड. अभय आगरकर, दिलीप सातपुते, सुवेंद्र गांधी, नगरसेवक योगीराज गाडे, स्वप्नील शिंदे, भैय्या गंधे, मनोज दुलम, अमोल येवले, संगीता खरमाळे हे उपस्थित होते.
सुजय विखे पुढे म्हणाले की, मग यांना आमदार, खासदार कशाला होयचे. मुंबई, दिल्ली फिरायला का लोकांना त्रास देण्यासाठी, गुंड पाळण्यासाठी, हत्याकांड करण्यासाठी, पोलीस अधीक्षक कार्यालय फोडण्यासाठी. या समोरच्या उमेदवाराची घोषणा झाली त्याच दिवशी माझे टेंन्शन समोर शिफ्ट झाले. मी लोकांना म्हणतो टेंन्शन मला नाही तुम्हाला आहे. तुम्ही चुकीचे बटन दाबले का तुमचे टेंन्शन सुरू. कारण पुढच्या पाच वर्षाचे तुमचे, कुटुंबाचे, शहराचे भविष्य ठरणार आहे असे बोलून नाव न घेता राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना टोला लगावला आहे.