मावळातील रस्त्यांची गेल्या १० वर्षांत दुरवस्था झाली असून आमदार झाल्यानंतर आपण अग्रप्राधान्याने रास्ते विकासाचे काम हाती घेणार आहे. ‘खड्डेमुक्त रस्ते‘ हा आपला मावळवासीयांना शब्द आहे, अशी ग्वाही मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांनी सोमवारी रात्री महागाव येथे बोलताना दिला. सुनील शेळके यांनी सोमवारी रात्री शेवती वसाहत, महागाव, सावंतवाडी, दत्तवाडी, निकमवाडी, प्रभाची वाडी, काले आदी गावांमध्ये प्रचारदौरा करून मतदारांशी संवाद साधला.
सुनील शेळके म्हणाले की, चांगल्या रस्त्यांमुळे परिसरातील विकासाचा मार्गही प्रशस्त होतो, मात्र दुर्दैवाने रस्ते विकास तसेच त्यांची देखभाल-दुरुस्ती याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. हे चित्र बदलण्यासाठी मावळवासीयांनी आता परिवर्तनाच्या बाजूने कौल देण्याची गरज आहे. आपण आतापर्यंत दिलेला प्रत्येक शब्द पाळलेला आहे. त्यामुळे मावळवासीयांनी आपल्याला तालुक्याचा विकास करण्याची एकदा संधी द्यावी.