भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर जोरदार टीका केलेली आहे. गोपीनाथ मुंडे असते तर आज ही वेळ आली नसती असं एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या नेत्यांमुळेच भाजपाची शेटजी, भटजींचा पक्ष अशी असणारी ओळख बदलून बहुजन समाजाचा पक्ष अशी बनवण्यात यश आल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी एकनाथ खडसे गोपीनाथगडावर उपस्थित आहेत.
“शेटजी भटजींचा पक्ष म्हणून भाजपाची ओळख होती. पण गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, अण्णा डांगे, नितीन गडकरी अशा अनेक नेत्यांनी पक्षासाठी काम केलं आणि पक्षाची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामुळे पक्षाची ओळख बहुजन समाजाचा पक्ष अशी बदलण्यात यश आलं. संघर्षाच्या कार्यकाळात गोपीनाथ मुंडे यांनी नेतृत्त्व केलं. त्यांचा सहकारी होतो याचा मला अभिमान आहे.