लवकरच मुंबईकरांना अनुभवता येणार नाईट-लाइफ
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ‘नाईट लाईफ’च्या संकल्पनेवर आता प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरु झाल्या आहेत. नाइटलाइफ अंतर्गत मुंबईतील दुकाने, मॉल्स, हॉटेल्स २४ तास सुरू ठेवल्यास सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अनिवासी ठिकाणांची यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानुसार त्या परिसराची पाहणी करून पोलिसांच्या मदतीने अतिरिक्त सुरक्षा ठेवण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
मुंबई २४ तास जागी असते. त्यामुळे येथील व्यवहार २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आहे. २६ जानेवारीपासून मुंबईतील अनिवासी क्षेत्रांमधील मॉल्स, दुकाने, रेस्टॉरंट २४ तास सुरू राहातील. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची खबरदारी पोलिसांसह पालिकेलाही घ्यावी लागणार आहे. यासाठी २४ तास सुरू ठेवण्यात येणारी दुकाने, मॉल्स, रेस्टॉरंट आदी परिसराचा आढावा महापालिका घेणार आहे. सुरुवातीला हा प्रयोग अनिवासी क्षेत्रे म्हणजेच काळाघोडा, वांद्रे-कुर्ला संकुल, नरिमन पॉइंट अशा ठिकाणी होणार आहे.