लोकांकडे पैसे नाहीत तर उत्पादन केलेल्या वस्तू कोण घेणार? – पृथ्वीराज चव्हाण.
केंद्रातील मोदी सरकारने २० लाख काेटींचे पॅकेज जाहीर केले असले तरी त्यामधून गरीब, मजूर, शेतकरी व नाेकरदारांच्या हातात काहीच पैसे मिळणार नाहीत म्हणून जाहीर केलेल्या या पॅकेजचा अर्थव्यवस्थेला काहीही उपयोग होणार नाही. आपल्याकडे उत्पादन निर्मिती केली जात असली तरी जाेपर्यंत लाेकांच्या हाती पैसे येणार नाही, ताेपर्यंत या वस्तू खरेदी काेण करणार? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारला केला आहे. ब्रिटनच्या सरकारने तेथील मजुरांना सव्वा दोन लक्ष रुपये व अमेरिकेने ७० हजार दरमहा मदत केलेली आहे, मग ती सरकारे वेडी आहेत का? आपल्याकडे लाॅकडाऊन शिथिल करताना उद्योग सुरू करून अन् उत्पादन निर्मिती केली जात असली तरी लोक वस्तू खरेदी कशा करणार?, असा सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
अर्थव्यवस्था रुळावर आणायची असेल तर जून महिन्यात केंद्र आणि राज्य सरकारने मिनी अंदाजपत्रक जाहीर करावे, अशी सूचनाही त्यांनी केली आहे. अर्थव्यवस्था रुळावर यावी, यासाठी केंद्राने २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यातून थेट मदत फक्त दोन लाख कोटींची होणार आहे. उर्वरित रकमेचे पॅकेज संभ्रम निर्माण करणारे आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.