Skip to content Skip to footer

“रावसाहेब दानवेंना घरात घुसून चोपलं पाहिजे”

शेतकरी आंदोलन: दानवेंच्या आरोपावर बच्चू कडूंचा संताप

दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं शेतकरी आंदोलन आता व्यापक स्वरूप प्राप्त करताना दिसत आहे. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी, या आंदोलनामागे विरोधकांचा हात असल्याचे अनेकदा आरोप केले आहेत. परंतु, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मात्र या आंदोलनाबाबत एक वादग्रस्त विधान केलं. सध्या सुरू असलेले शेतकरी आंदोलन हे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा यात हात असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर सडकून टीका केली. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. तसंच, त्यांना घरात घुसून फटकवायला हवं असंही कडू म्हणाले. “गेल्या वेळी जेव्हा रावसाहेब दानवे यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं, तेव्हा आम्ही त्यांच्या घराला घेराव घातला होता. पण आता परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. सध्याची परिस्थिती पाहता आता तर रावसाहेब दानवेंच्या घरात घुसून त्यांना चोपलं पाहिजे”, असं विधान बच्चू कडू यांनी केलं आहे.

“सर्व देशभरात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असून पाठिंबा मिळत आहे. अशामध्ये शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे म्हणणं शेतकऱ्यांचा अपमान आहे. रावसाहेब दानवे हिंदुस्थानचे आहेत की पाकिस्तानचे हे समजण्यासाठी त्यांचा डीएनए तपासणं गरजेचं आहे,” असेही बच्चू कडू म्हणाले.

रावसाहेब दानवेंचे वक्तव्य-

“सध्या सुरू असलेलं आंदोलन हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाही. याच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. आधी देशातील मुस्लीम समाजाला उचकवलं आणि सांगितलं सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावं लागेल पण एखादा तरी मुसलमान बाहेर गेला का? त्यात ते यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना सरकार तुम्हाला तोट्यात घालत असल्याचं सांगत आहेत. हे बाहेरच्या देशाचं षडयंत्र आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे,” अस दानवे म्हणाले.

Leave a comment

0.0/5