दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल पुन्हा असे वक्तव्य केले तर, आमदार रोहित पवारांचा रावसाहेब दानवे यांना इशारा
देशात लागू केलेले कृषी कायदे रद्द करावे यासाठी मागच्या १२-१४ दिवसांपासून शेतकरी राजधानी दिल्ली येथे आंदोलन करत आहे. यावर मंत्री रावसाहेब दानवे यांनी भाष्य करताना, शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केला होता. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री रावसाहेब दानवे यांना चांगलीच समज दिली आहे.
मंत्री दानवे यांच्यासारख्या विरोधी पक्षातील अनेक नेत्यांच्या वक्तव्यांची हल्ली कोणी फारशी दखल घेत नाही. मात्र, दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल पुन्हा असे वक्तव्य केले तर मात्र आम्ही विरोधक म्हणून नाही तर राजकारणाबाहेर जाऊन सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून योग्य ते उत्तर देऊ असा इशारा पवार यांनी दिला आहे.
शेतकरी स्वत:च्या हितासाठी लढत असताना त्यांना शत्रुराष्ट्रांकडून मदत मिळत असल्याचे म्हणणे म्हणजे आपल्या घाणेरड्या विचारसरणीचे प्रदर्शन आहे. दानवे यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांबद्दल निंदनीय वक्तव्य केले होते. त्यावेळी त्यांचे शेतकऱ्यांबद्दल असलेले विचार लोकांना कळून चुकले होते. दानवे यांचे ते वक्तव्य शेतकरी अद्याप विसरलेले नाहीत. असे रोहित पवार यांनी बोलून सुद्धा दाखविले.