…..मग फडणवीस सरकारने क्षमता नसलेले वकील नेमले असे म्हणायचे का? – अशोक चव्हाण
मराठा आरक्षणाच्या वादावरून विरोधकांनी पुन्हा एकदा आघाडी सरकारवर टीका केली आहे. याच पाश्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
या प्रकरणाबाबत विरोधी पक्षाकडून मराठा समाजाची दिशाभूल सुरू आहे. समाजाला वस्तुस्थितीशी विसंगत व विपर्यास करणारी तसेच धादांत खोटी माहिती दिली जाते आहे. न्यायालयात बाजू मांडण्याचे काम शेवटी वकिलांचे असते. त्यामुळे सरकार अपयशी ठरले, असे जे म्हणतात ते अप्रत्यक्षपणे सरकारच्या वकिलांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत.
मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणारे वकील हे फडणवीस सरकारच्या काळात नेमले गेले होते. ते अपयशी ठरले असे म्हणायचे असेल तर मग फडणवीस सरकारने क्षमता नसलेले वकील नेमले असे म्हणायचे का? पण आम्ही तसे राजकीय आरोप करणार नाही. कारण वस्तुस्थिती तशी नाही. सरकारच्या वकिलांनी अतिशय उत्तमपणे बाजू मांडली आहे असेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.