तो’ आपल्या गळ्यातील ताईत कायम आहे का? हे भाजपच्या ‘त्या’ नेत्यांनी सांगावं- रोहित पवार
आर भारत वृत्तसमूहाचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवारांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत सवाल उपस्थित केला होता.
अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर भाजपा नेत्यांनी आंदोलने केली होती. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही ट्विट करून टीका केली होती. मात्र, अर्णब यांचे व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर भाजपानं या प्रकरणावर गुळणी धरली असून, रोहित पवारांनी वर्मावरच बोट ठेवले आहे.
तसेच अर्णब गोस्वामी यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या आणि बोलणाऱ्या भाजपा नेत्यांना रोहित पवार यांनी सवाल केला आहे. त्याचबरोबर अर्णब गोस्वामी यांच्यावर केंद्र सरकार कारवाई करणार की, पाठीशी घालणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे.
“लोकांचे विषय मांडणारे लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना देशद्रोही ठरवणाऱ्या भाजपाभक्त पत्रकाराला भाजपाच्या अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला होता. आता या कथित पत्रकाराचा खरा चेहरा पुढं आल्यानंतरही तो आपल्या गळ्यातील ताईत कायम आहे का? हे भाजपाच्या त्या नेत्यांनी सांगावं. असे ट्विट रोहित पवारांनी केले होते.