Skip to content Skip to footer

भारताला मोठा धक्का, रोहित शर्मा दुखापतीमुळे कसोटी मालिकेतूनही बाहेर

भारताचा हिटमॅन रोहित शर्मा दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यावेळी फलंदाजी करताना पायाचे स्नायू दुखावल्याने तो रिटार्यड हर्ट झाला होता. त्याने नाबाद 60 धावा केल्या होत्या. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे भारताला मोठा धक्का बसणार आहे. भारताच्या आघाडीच्या फळीची मदार त्याच्यावर होती. आता त्याच्या जागी संघात कोणाला संधी द्यायची असा प्रश्न टीम इंडियासमोर असेल.

न्यूझीलंडविरुद्ध 5 फेब्रुवारीपासून एकदिवसीय मालिका सुरु होणार आहे. त्यात तो खेळण्याची शक्यता कमी असल्याचं केएल राहुलने सांगितलं होतं. त्यानंतर होणाऱ्या कसोटी मालिकेतही रोहित खेळू शकणार नसल्याची माहिती आता समोर येत आहे.पाचव्या सामन्यात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. फलंदाजीवेळी झालेल्या दुखापतीमुळे अर्धवट मैदान सोडून जावं लागलं होतं. पाचव्या सामन्यात त्याने सलामीला न येता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. आता वनडेमध्येही रोहित नसल्यानं नवीन सलामीची जोडी खेळताना दिसेल.

न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात भारताने 7 धावांनी विजय मिळवला. भारताने दिलेल्या 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची अवस्था एकवेळ 3 बाद 17 अशी झाली होती. त्यानंतर रॉस टेलर आणि टिम सेफर्टने सावध खेळ करत डाव सावरला. 9 षटकांत न्यूझीलंडच्या 64 धावा झाल्या होत्या. त्यानतंर दहाव्या षटकात सेफर्ट आणि टेलरने शिवम दुबेच्या एका षटकात 34 धावा वसूल केल्या. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी सामन्यावर पकड मिळवली. टिम सेफर्टला नवदीप सैनीने बाद केल्यानंतर न्यूझीलंडचे खेळाडू एका पाठोपाठ एक बाद होत गेले. सैनी, वॉशिंग्टन सुंदर आणि बुमराह यांच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझींलडचे तळाचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत आणि त्यांचा डाव 156 धावांत संपुष्टात आला.

Leave a comment

0.0/5