महाराष्ट्रातील वातावरण भयमुक्त, आदित्य ठाकरेंचा भाजपाला टोला
नाईट लाईफच्या निर्णयावर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नाईट लाईफमुळे रोजगार आणि महसुलात मोठी वाढ होईल, असा दावा मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला.
देशाची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. रोजगारांचे प्रमाणही घटले आहे. मात्र, महाराष्ट्रात आता भयमुक्त वातावरण आहे. त्यामुळे उद्योग वाढीला चालना मिळणार असल्याचे आदित्य यांनी सांगितले. तसेच विरोधकांच्या टीकेला मला उत्तर द्यावेसे वाटत नाही. मन दुषित असेल तर दृष्टीकोनही तसाच असतो असा टोला भाजपाला लगावला.
महाराष्ट्रातील जनतेचे मन स्वच्छ आहे. दुकाने रात्री उघडी राहिल्याने फायदा होईल. रोजगाराची संधी निर्माण होईल. महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेत असल्याचेही यावेळी आदित्य यांनी म्हटले. दरम्यान, आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाईट लाईफच्या निर्णयावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून नाईटलाईफ सुरू होत आहे. येत्या २६ जानेवारीपासून या निर्णयाची मुंबईत अंमलबजावणी करण्याची घोषणा करण्यात आली होती.