ठाकरे सरकारच्या निर्णयांमुळे मिळणार काही प्रमाणात दिलासा.
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या बैठकीत शेतकरी, व्यापारी तसेच सहकारी संस्थांच्या बाबतीत विशेष चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन लागू असून, यामुळे अनेक व्यवसाय व उद्योग धंदे बंद असल्याने अनेकांच्या समस्यांमध्ये भर पडत आहे. त्यात प्रामुख्याने शेतकरी व व्यावसायिक क्षेत्र हे रखडलं असून, त्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी आणि अर्थचक्र सुरळीत सुरू ठेवण्यासाठी या बैठकीत निर्णय घेण्यात आले आहेत.
ज्यामध्ये दूध उत्पादकांच्या ४ कोटी लिटर दुधाचे बुकटीत रूपांतर करणे, व्यापारी वर्गासाठी जीएसटी कायद्यात सुधारणा, सहकारी संस्थांच्या अधिनियमात सुधारणा व विशेष म्हणजे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना थकबाकीदार न समजता बँकांनी कर्ज देण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे एकूणच राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे व्यापारी, शेतकरी तसेच सहकार क्षेत्रातून स्वागत केले जात आहे.
तसेच मे व जून महिन्यातील ३ कोटी केशरी शिधा पत्रक धारकांसाठी राज्य सरकार मार्फत देण्यात येणाऱ्या रेशनचे वाटप सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती देखील मिळाली आहे.
त्याप्रमाणे केशरी कार्ड धारकांना ८₹ प्रतिकिलो प्रमाणे ३ किलो तांदूळ, १२₹ प्रतिकिलो प्रमाणे २ किलो तांदूळ असे धान्य वाटप शिधा वाटप केंद्रातून सुरू करण्यात आले आहे. एकंदरीत महाराष्ट्र राज्य सरकारने सुमारे साडे चार लाख मेट्रिक टन गहू व तांदूळ वितरित करून गरजुंच्या हक्काचे धान्य त्यांच्या पर्यंत पोहचविले जाणार आहे, अशी माहिती राज्यसरकारतर्फे देण्यात आली आहे.