उद्धव ठाकरे अक्षम कंगनाची टीका, संजय राऊतांचे जोरदार प्रतिउत्तर
सिनेअभिनेत्री कंगना रानौत हिने पुन्हा एकदा ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारवर निशाणा साधला होता. मुंबईत गुंडाराज चालू असल्याचा तिने आघाडी सरकारवर आरोप लावला तसेच मुख्यमंत्री ठाकरे हे जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री आहे असा उल्लेख करत टीका केली होती.
रानौत हिने केलेल्या टीकेचा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत चांगलाच समाचार घेतला आहे. राऊत म्हणाले की, ‘कंगना तरुण आहे, त्यांनी राग व्यक्त केला पाहिजे. तरुणांचा राग मनात दाबला तर स्फोट होतो. राग व्यक्त करणे चांगल्या मानसिकतेचे दर्शन आहे. फक्त त्यात विकृती नको’ असे त्यांनी बोलून दाखविले.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, “मी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढणारा एका सामान्य कार्यकर्ता, शिवसैनिक आहे. आम्हाला हे बाळकडू आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते बाळासाहेब ठाकरेंपर्यंत सर्वांनी दिलं आहे. जर कोणी महाराष्ट्राची बदनामी करत असेल, आमच्या नेत्यावर चिखलफेक करत असेल तर उसळून उठलं पाहिजे. आम्ही काही षंढासारखे बसून राहणार नाही. असे त्यांनी बोलून दाखविले.