कोरोनाच्या पाश्वभूमीवर मागच्या सात-आठ महिन्यापासून रेल्वे सेवा सामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आलेली आहे. मात्र आता सर्व स्थरातून विशेष करून प्रावाशांकडून रेल्वे सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी होत आहे. यावर आता रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी सूचक उत्तर दिले आहे.
एवढ्यात तरी भारतीय रेल्वेसेवा पूर्णपणे पूर्वपदावर सुरू करता येणार नाही असे रेल्वे बोर्डाचे चेअरमन व्ही. के. यादव यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनामुळे सध्या रेल्वेसेवा देशभरातच मर्यादित स्वरुपात सुरू आहे. ती पूर्णपणे कधी सुरळीत होणार याची कोणतीही तारीख निश्चित नाही असं त्यांनी सांगितलं आहे.
रेल्वेसेवा खंडित असल्याने गेल्या वर्षीपेक्षा रेल्वेच्या उत्पन्नात ८७ टक्क्यांची घसरण झाल्याचंही यादव यांनी सांगितलंय आहे. दरम्यान सध्या देशभरात १०८९ विशेष रेल्वे धावत आहेत तर कोलकात्यात मेट्रो रेल्वे ६० टक्के मुंबईत ८८ टक्के लोकल सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. तर उर्वरित सेवा हळूहळू सुरू कऱण्यात येईल असेही व्ही. के यादव यांनी म्हटले आहे.