हाथरस येथे एका दलित अल्पवयीन मुलीवर तेथील स्थानिक सवर्ण जातीच्या मुलांनी बलात्कार करून तिच्यावर अमानवीय कृत्य केले होते. या प्रकरणावरून संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली होती.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रशासनाने तर रात्रीच्या अंधारात उपचारा दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या त्या अल्पवयीन मुलीवर अंत्यसंसरकार करून प्रकरण दाबण्याचा प्रकार केला होता. तसेच बलात्कार झालाच नाही असे उत्तरप्रदेश सरकारकडून सांगण्यात आले होते.
मात्र आता सीबीआयच्या तपासात यासंदर्भात खळबळजनक माहिती पुढे आलेली आहे. सीबीआयने चारही आरोपींविरोधात सामूहिक बलात्कार आणि हत्या झाल्याचा निष्कर्ष काढत आरोप निश्चिती केले आहे. ऐन कोरोना संकटात सप्टेंबर महिन्यात हाथरसमध्ये झालेल्या या घटनेनंतर देशभरातून उद्रेक उमटला होता.
उत्तर प्रदेश पोलिसांनी सुरवातील हे ऑनर किलींग असल्याच सांगितले होते. तसेच शवविच्छेदन अहवालही सामुहीक बलात्कार नसल्याचं सांगितलं होतं. मोठ्या प्रमाणात देशव्यापी टीका झाल्यानंतर हा तपास सीबीआयनं हाती घेतला. तीन महिन्यात सखोल चौकशी करुन सीबीआयकडून आरोपींविरोधात बलात्कार आणि हत्येचा आरोप निश्चित करुन आता सीबीआयने आरोपींविरोधात हाथरसमधील न्यायालयात चार्जशीट दाखल केली आहे.