महाराष्ट्र बुलेटिन : बँकांचे खाजगीकरण केल्याच्या विरोधात गेल्या चार दिवसांपासून बँकांचे काम बंद असल्यामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागील आठवड्यात शनिवारी व रविवारी बँकेला सुट्टी होती, मात्र सोमवारी आणि मंगळवारी बँकांच्या खाजगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला आहे. त्यामुळे सलग चार दिवस बँका बंद राहिल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे.
सरकारच्या धोरणांच्या विरोधात देशभरातील सुमारे १० लाख कर्मचारी व अधिकारी या संपामध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे देशभरातील सार्वजनिक बँकांची कार्यालये बंद आहेत. बँकांचे कामकाज बंद राहिल्याने १६५०० कोटींच्या चेकचे व्यवहार होऊ शकले नाहीत. त्यामुळे ग्राहकांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.
बँकांच्या या संपामुळे देशभरातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून एटीएम आणि डिजिटल बँकिंग सेवेवरच ग्राहकांना अवलंबून राहावे लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये जवळपास ६५०० कोटींचे चेक, डीडी आणि पे ऑर्डर्सचे व्यवहार ठप्प झाले आहेत. तसेच दिल्लीमध्ये ४८५० कोटींचे चेक रखडलेल्या अवस्थेत आहेत.