Skip to content Skip to footer

मनपाने उभारले प्रयोगशील विज्ञान केंद्र

चंद्रपूर : मनपाच्या सावित्रीबाई फुले शाळेत समग्र शिक्षा अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्राची निर्मिती करण्यात आली. महापौर अंजली घोटेकर व आयुक्त संजय काकडे यांच्या हस्ते शुक्रवारी या केंद्राचे उद्घाटन झाले.
मनपा शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कृतिशील व निरीक्षण क्षमतेला चालना देण्यासाठी विज्ञान केंद्र प्रेरणादायी ठरत आहे. महापौर व आयुक्तांनी केंद्राच्या विविध संसाधनांची माहिती जाणून घेतली. शासनाने सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षक शिक्षण या योजनांचे एकत्रिकरण करून समग्र शिक्षा अभियान योजनेची निर्मिती करण्यात आली.

पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या मुलांसाठी हे अभियान उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थ्यांना विज्ञान संशोधनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या विज्ञान केंद्रात विविध प्रकारचे गणित व विज्ञानाची संसाधने (भाग) उपलब्ध करून देण्यात आली आहेत. महापौर घोटेकर म्हणाल्या, विज्ञानाचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे तर्कशास्त्रावर विश्वास ठेऊन आपल्या मनात अंधश्रद्धा बाळगू नका.

विज्ञानाचे बारकावे शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. आयुक्त काकडे म्हणाले, शिक्षकांनी आधुनिकतेची कास धरावी. विद्यार्थ्यांना दरदिवशी जगात घडत असलेल्या किमान दोन चांगल्या गोष्टींची माहिती द्यावी. आज मनपा शाळा दिवसेंदिवस प्रगती करत आहेत. शाळेत १९० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. शिक्षणाचा कनिष्ठ दर्जा व मूलभूत सुविधांचा अभाव हे कुठलीही शाळा बंद पडण्याची प्रमुख करणे असतात.

मात्र, मनपाने त्यावर कार्य करून शाळांचा दर्जा सुधारला आहे. शिक्षकांनी दर्जावर भर द्यावा. आवश्यक ती मदत पालिका करण्यास तयार आहे, असेही आयुक्त काकडे म्हणाले. उपमहापौर अनिल फुलझेले, उपायुक्त गजानन बोकडे, नगरसेवक प्रदीप किरमे, नगरसेविका कल्पना बगुलकर, शहर अभियंता महेश बारई, प्रशासन अधिकारी नागेश नीत, पालकमंत्री फेलो पुजा द्विवेदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी तयार केल्या कापडी पिशव्या
विद्यार्थ्यांच्या मनात प्लास्टिकमुक्तीचा संदेश रूजावा, याकरिता विद्यार्थ्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी घरून जुने कापड आणले. त्यातून कापडी पिशव्या बनविल्या. पर्यावरणाला घातक ठरणाºया प्लास्टिक थैलीचा वापर न करता घरीच कापडांपासून तयार केलेल्या पिशव्या वापरण्याचा संदेश देण्यात आला. पारंपरिक पद्धतीने घरच्या कपड्यांपासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्यांचा वापर दैनंदिन जीवनात सहजपणे करता येतो, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
प्लास्टिकमुक्तीसाठी हरितगाडी
प्लास्टिकमुक्तीच्या जनजागृती करण्यासाठी मनपातर्फे हरितगाडी तयार करण्यात आली. या गाडीतील ध्वनिफितीद्वारे जागृती केली जाणार आहे. जुनी बंद असलेल्या गाडीचे नविनीकरण करून पर्यावरणपूरक संदेश जनमानसात पोहचविण्यासाठी मनपाने हा उपक्रम सुरू केला.

Leave a comment

0.0/5