भारतीय जनता पक्षाकडून वारंवार महाविकास आघाडीचे सरकार अंतर्गत कलहामुळे कोसळणार असल्याचा दावा केला जात आहे. भाजपच्या या दाव्याला महाविकास आघाडी सरकारकडून उत्तर देत राज्यात स्थापन झालेल्या सरकारला कुठलाही धोका नसून सरकार पडणार नसल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून देण्यात आले आहे. याच दरम्यान आता राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपच्या या दाव्यावर निशाणा साधला आहे.
‘विरोधी पक्षाला सतत बोलावे लागते. महाविकास आघाडी सरकार पडणार नाही. तसेच सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. आमदार आणि कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरु आहे, म्हणून कार्यकर्ते आणि आमदार जपण्यासाठी गाजर दाखवावे लागते. त्यामुळे विरोधक पडणार’, असे बोलत असल्याचा टोला अजित पवारांनी भाजपाला टोला लगावला होता.
कराड येथे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त अजित पवार यांनी प्रीतिसंगम येथे समाधी स्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.