Skip to content Skip to footer

मुंबई-महाराष्ट्रावर कोरोनाच्या धोक्याची टांगती तलवार, आजच्या सामना अग्रलेखातून भाष्य

 

राजधानी दिल्ली येथे पुन्हा कोरोनाने थैमान घालण्याचे सुरु केले आहे. त्यात दिल्लीमध्ये दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही राज्य सरकार सतर्क झाले आहे. रविवारी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी दुसरी लाट ही लाट नसून त्सुनामी असेल असे भाकीत केले होते. यावरच आजच्या सामना अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

दिल्लीसह काही राज्यांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेची चिंता व्यक्त होत असताना कोरोना लसीकरणाची चाहूल आश्वस्त करणारी आहे. अर्थात हे सगळे अजून तरी जर-तरच्या पातळीवरच आहे. त्यामुळे कोरोनाबाबत मागील सात-आठ महिन्यांपासून आपण जी सतर्कता बाळगत आहोत, खबरदारी घेत आहोत ती पुढेही घ्यावीच लागेल. कोरोना लसीची चाहूल देणा-या बातम्या दिलासादायक नक्कीच आहेत, पण त्याच वेळी कोरोनाच्या दुसऱया लाटेचे तडाखे काही ठिकाणी बसू लागले आहेत. या धोक्याची टांगती तलवार मुंबई-महाराष्ट्रावरही आहे, हे विसरून चालणार नाही. आपल्याला सजग आणि सतर्क राहावेच लागेल, असा सल्ला सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

* दिल्लीसह गुजरात, मध्य प्रदेशमधील काही शहरांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू झाला आहे. त्यामुळे तेथील राज्य सरकारे तर सतर्क झाली आहेतच, पण मुंबई-महाराष्ट्रालादेखील हाय ऍलर्ट राहावे लागणार आहे. कारण अनलॉक-५ प्रक्रियेमध्ये अनेक व्यवहार सुरू झाले आहेत. दळणवळण, वाहतूकही होऊ लागली.

* दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यांमधून आवक-जावक सुरू झाली आहे. मुंबई हे सर्वच मार्गांनी देश आणि परदेशांशी जोडले गेलेले आर्थिक राजधानीचे शहर आहे. त्यामुळे बाहेर वाढलेल्या कोरोनाच्या धोक्याचा सर्वाधिक इशारा मुंबई आणि महाराष्ट्रालाच आहे. महाराष्ट्र सरकारनेही त्यादृष्टीने सर्व आघाडय़ांवर तयारी केलीच आहे. जिल्हा प्रशासनांना सतर्क करण्यात आले आहे. जनतेला दुसऱ्या संभाव्य लाटेच्या परिणामांची जाणीव करून देण्याचा प्रयत्नही सुरूच आहे.

* स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही रविवारी जनतेशी याचसंदर्भात संवाद साधला आणि खबरदारी घेण्याचे आवाहन केले. प्रश्न आहे तो विरोधकांचा. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका समोर असूनही त्यांचे वेगळेच सुरू आहे. राज्य सरकार एकीकडे कोरोना उपायांची केंद्र सरकारनेच घालून दिलेली त्रिसूत्री काटेकोरपणे अमलात आणत असताना विरोधी पक्षांचे वागणे त्यालाच छेद देणारे असेल तर कसे व्हायचे? तरीही राज्य सरकार आपल्या परीने कोरोनाचा कमी झालेला प्रादुर्भाव पुन्हा वाढू नये यासाठी पावले उचलत आहेच.

Leave a comment

0.0/5