औरंगाबाद शहर हे राज्यातील मोठा ऐतिहासिक वारसा असलेलं शहर म्हणून ओळखलं आहे. आज औरंगाबाद शहरामध्ये असलेल्या ऐतिहासिक वास्तूंना भेटी देण्यासाठी इतर राज्यातीलच नाही तर देश-विदेशातील नागरिक या शहराला भेट देतात. घृष्णेश्वर जोतिर्लिंग मंदिर, बिबी का मकबरा, दौलताबाद किल्ला या काही प्रमुख ऐतिहासिक वास्तूंना भेटी देण्यासाठी दुरवरून पर्यटक औरंगाबाद जिल्ह्यात येत असतात.
याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्याचा पर्यटनाच्या दृष्टीने अधिक विकास व्हावा यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची औरंगाबादचे आमदार तथा जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी गुरुवारी मुंबई येथे भेट घेतली. या बैठकीत औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना पायाभूत सुविधा देण्याबाबत मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली.
ऐलोरा अर्थात वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वरकडे जाणे सोपे होण्यासाठी धुळे-सोलापूर महामार्गाचा एक स्वतंत्र इंटरचेंज देण्याची गरज आहे, अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती. या व्यतिरिक्त आमदार अंबादास दानवे यांनी शहराच्या विकासासाठी एकूण १४ मागण्या केल्या होत्या.