औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्दयावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनेकदा औरंगाबाद शहराच्या नावाचा उल्लेख संभाजीनगर असा मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आला. यावरून आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने यावर नाराजी व्यक्त केली होती. आत यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे.
औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याची इच्छा बाळासाहेब ठाकरे यांचीच होती. त्यामुळे त्यांच्या विचाराशी, भूमिकेशी आम्ही प्रामाणिक आहोत. यावरुन कोणी राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये, असे मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
पुढे शिंदे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. त्याठिकाणच्या लोकांचीही तीच मागणी आहे. त्यामुळे आम्ही त्या मागणीला पाठींबा देत आहोत. शासन म्हणूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीत यावरुन मतभेद असल्याचे चित्र चुकीचे आहे. यात राजकारण कुणीही आणू नये. त्यामुळे योग्य वेळी याचा निर्णय होईल. आमची भूमिका आम्ही ठामपणे मांंडली आहे असे त्यांनी बोलून दाखिवले.