केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी विषयक बिला विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्ली बॉर्डरवर देशभरातील शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.हे आंदोलन गेल्या ७९ दिवसांपासून सुरूच आहे.केंद्र सरकारसोबत ११ वेळा चर्चा झाल्या.
मात्र, तरीही यावर अद्याप तोडगा निघू शकला नाही. हे कृषी बील रद्द व्हावे, या मागणीवर शेतकरी आडून बसले आहेत.या शेतकऱ्यांना देशभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.अश्यात शिवसेना खासदार संजय राऊत गाझीपूर बॉर्डरवर शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत.
यावेळी त्यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली. दरम्यान तिकरी बॉर्डवर पोलिसांनी शेतकऱ्यांना अडवण्यासाठी मोठे खिळे लावले आहेत. तसंच बॅरिकेट्सच्या भिंतं उभारली आहे. यावरुनही संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.
यावेळी त्यांनी, ‘शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी आम्हा सर्व खासदारांना आदेश दिला. ज्याप्रकारे सरकारतर्फे अन्याय, दहशत केली जात आहे, त्यांच्या पाठीशी उभं राहणं, पाठबळ देणं आपलं कर्तव्य आहे. उद्धव ठाकरे यांचा निरोप, संवेदना घेऊन आपण येथे पोहोचलो आहोत’,असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.