कृषी कायद्यांविरोधात शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड वगळता देशभरात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या चक्का जामला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ठिकठिकाणी शेतकरी आंदोलकांनी रस्त्यावर येत वाहतूक रोखली आहे. आंदोलकांनी पंजाब, हरयाणात जाणारे महामार्ग बंद केले आहे. त्यामुळे सर्वत्र चक्काजाम असतेच चित्र दिसून येत आहे.
सकाळी ११ पासून गाझीपूर बॉर्डरवरही शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले असून देशातील शेतकऱ्यांना मातीशी जोडू, नव्या युगाचा जन्म होईल असे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी चक्का जाम आंदोलन सुरू झाल्यानंतर म्हटलं आहे.
शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले, देशभरात शांततेत चक्का जाम आंदोलन सुरू झालं आहे. देशाच्या मातीशी शेतकऱ्यांना जोडणार आहोत. यातून नव्या युगाचा जन्म होईल. इथे राजकारण करणारे नाहीत. कुठे दिसत आहेत. इथे कुणीही येत नाहीये.
पुढे हे बोलताना ते म्हणाले की, हे जनआंदोलन आहे. भाकरी तिजोरीत बंद होऊन नये म्हणून हे आंदोलन आहे. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये काही गोंधळ घालणारे होते, त्यामुळे तिथे चक्का जाम करण्यात आलेला नाही. आम्ही कुठेही जाणार नाही. आम्ही ऑक्टोबर पर्यंत इथेच बसून आहोत असे त्यांनी म्हणून दाखविले.