“काँग्रेस सरकारमधील तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रस्तावित केलेला वस्तू आणि सेवा कर कायदा (GST) पंतप्रधान मोदी यांनी जशाचा तसा का मंजूर केला नाही?” अशी विचारणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एकच कृषी उत्पन्न बाजार समिती असावी, असे म्हटले होते, याचा हवाला दिला. त्यावरून नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. मुंबईत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना पाटोले म्हणाले की, “पंतप्रधान संसदेत बोलले, हीच मोठी गोष्ट आहे. इतरवेळेस पंतप्रधान मोदी संसदेऐवजी सभांमधूनच अधिक बोलत असतात. कृषी कायद्याचे समर्थन करताना पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे उदाहरण दिले. असे असेल, तर मग मनमोहन सिंग यांनी आणलेला जीएसटी कायदा जशास तसा स्वीकारला का नाही, अशी विचारणा करत पंतप्रधान मोदी खोटे बोलत आहेत. वारंवार खोटे बोलत आहेत.” अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.