पहिल्या दोन भागांत अर्शदनं साकारली होती सर्किट ही व्यक्तीरेखा
मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटाचे पहिले दोन भाग फारच गाजले. मुन्नाभाई आणि सर्किटची जोडीही फार गाजली. दुसऱ्या भागानंतर या चित्रटाचा तिसरा भाग येणार का याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. या चित्रपटात सर्किटची भूमिका साकारणाऱ्या अर्शद वारसीनं अखेर यावर मोठं वक्तव्य केलं आहे. मुन्नाभाई ३ हा चित्रपट येण्याची शक्यता फार कमी असल्याचं अर्शद वारसीनं हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं. सध्या राजकुमार हिरानी हे अन्य चित्रपटांमध्ये व्यस्त आहेत. दरम्यान, “असं काहीही होणार नाहीये,” असं अर्शद वारसी मजेमेजेत म्हणाला. “मला असं वाटतं की तुम्ही विधू विनोद चोप्रा आणि राजकुमार हिरानी यांच्या घरी जायला हवं आणि यावर त्वरित काम करण्यासाठी सांगायला हवं,” असं तो म्हणाला. खुप मोठा कालावधी झाला राजकुमार हिरानी हे अन्य प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहेत आणि आमच्यासाठी ही दु:खद बाब आहे, असंही त्यानं स्पष्ट केलं.
मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटाच्या दोन्ही भागांमध्ये अर्शद वारसीनं सर्किट ही व्यक्तीरेखा साकारली होती. त्याच्या अभिनयाचं सर्वांनीच कौतुक केलं होतं. दरम्यान, संजय दत्त आणि अर्शदची जोडीही सर्वांना आवडली होती. खऱ्या आयुष्यातही ते एकमेकांचे चांगले मित्रच आहेत. संजय दत्तला कर्करोगाचं निदान झाल्यापासून आमच्यात सातत्यानं चर्चाही होत असते. तसंच त्याची प्रकृती आता उत्तम आहे. काही दिवसापूर्वी संजय दत्त दुबईत असतानाही चर्चा झाली असल्याचंही त्यानं सांगितलं.
“मी सतत एक अभिनेता म्हणून विचार करतो की आमचं काम केवळ लोकांचं मनोरंजन करणं हे आहे. जे लोकांना आवडतं तेच मला करायची इच्छा आहे. आपण तेच चित्रपट पाहतो जे आपल्याला आवडतात असंही आपण म्हणू शकतो. यासाठी लोकांना काही पाहायचं असेत तर त्यांच्या पद्धतीनं काम केलं गेलं पाहिजे. मी तसं जर करत असलो तर त्यात काही वावगं नाही. याचा अर्थ मला दुसऱ्या भूमिका पसंत नाहीत असंही नाही. मला गंभीर भूमिकाही साकारायला आवडतील. परंतु तुम्ही कोणत्या चित्रपटात काम करता यावर ते अववंबून असेल,” असंही अर्शदनं स्पष्ट केलं.