Skip to content Skip to footer

“याचं दु:ख मलाच माहिती,” रजनीकांत यांनी घेतला मोठा निर्णय

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांनी मोठा निर्णय घेतला आहे. रजनीकांत लवकरच आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करत नव्या पक्षाची घोषणा करतील याकडे सर्वांचं लक्षा लागलं असतानाच हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. रजनीकांत यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजकीय पक्ष सुरु करण्याचा विचार मागे घेतला आहे. रजनीकांत यांनी तीन पानांचं पत्र ट्विट करत ही घोषणा केली आहे. पक्ष स्थापन करत नसल्याबद्दल त्यांनी माफीदेखील मागितली आहे.
रजनीकांत यांनी आपण राजकीय पक्ष सुरु करणार नसून आपली बिघडलेली प्रकृती हा देवाने दिलेला इशारा होता असं म्हटलं आहे. रजनीकांत यांनी यावेळी आपल्यावर विश्वास ठेवलेल्यांना आपण बळीचा बकरा झालो असं वाटू नये असं सांगताना बिघडलेली प्रकृती हा एक इशारा असल्याचा उल्लेख केला आहे. रजनीकांत यांनी म्हटलं आहे की, “गेल्या काही दिवसांत माझ्या प्रकृतीसंबंधी ज्या काही घडोमाडी झाल्या त्या मी देवाचा इशारा समजतो आणि २०२१ तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढण्याचा विचार रद्द करत आहे”.

 

रजनीकांत यांना नुकतंच प्रकृती बिघडल्याने हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना रक्तदाब आणि थकव्याचा त्रास जाणवत होता. २७ डिसेंबरला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. डॉक्टरांनी त्यांना एक आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
रजनीकांत गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रीय आहेत. मात्र अधिकृतपणे त्यांनी राजकारणात प्रवेश केलेला नाही. गतवर्षी अभिनेता रजनीकांत आणि कमल हासन यांनी एकत्रित काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर दोन्ही पक्ष युती करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. गेल्या महिन्यात रजनीकांत यांनी आपला राजकीय प्रवेश लांबणीवर पडण्याचे संकेत दिले होते. रजनीकांत यांच्या नावे असणारं एक पत्र तामिळनाडूत चर्चेचा विषय ठरलं होतं, यामध्ये डॉक्टरांनी करोना काळात प्रचार कऱण्यावरुन रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली होती. डॉक्टरांनी रजनीकांत यांनी अजिबात प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता. रजनीकांत यांनी हे पत्र आपलं नसल्याचं स्पष्ट केलं होतं. दुसरीकडे भाजपा आणि काँग्रेस तसंच स्थानिक पक्षांनी हा रणनीतीची भाग असल्याचा दावा केला होता.
रजनीकांत यांनी डिेसेंबर २०१७ मध्ये तामिळनाडूत राजकीय पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली होती. जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर ही घोषणा करण्यात आली होती. मात्र लोकसभा नि़वडणुकीत रजनीकांत यांनी सहभाग घेतला नव्हता. पण आता होणारी विधानसभा निवडणूक ते लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र आता त्यावरही पडदा पडला आहे.

Leave a comment

0.0/5