पुणे – मराठा समाज आरक्षण आंदोलनादरम्यान गुरूवारी (दि.9) क्रांतीदिनी महाराष्ट्र बंद ठेवण्याची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टीने पीएमपी वाहतूक उद्या बंद ठेवण्याविषयीची चर्चा पीएमपी अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासन, वाहतूक पोलिसांशी बोलून निर्णय घेण्यात येणार आहे.
आंदोलनादरम्यान काही प्रवृत्तींकडून एसटी, पीएमपी बसेसना टार्गेट केले जात आहे. गेल्या आठवड्यात चाकण येथे झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने अनेक बसेस जाळण्यात आल्या. यामध्ये पीएमपीच्या 10 बसेस जाळण्यात आल्याने 87 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे आता पीएमपीकडून खबरदारी घेतली जात आहे. गुरूवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली असताना पीएमपी वाहतुकीबद्दल निर्णय घेतला जाणार आहे.