Skip to content Skip to footer

मागील दहा महिन्यात २३ लाख लोकांनी गमावला रोजगार – सांख्यिकी मंत्रालय

नवी दिल्ली – बेरोजगारांना रोजगार मिळवून देणे हा मोदी सरकारच्या विकास कार्यक्रमातील महत्त्वाचा मुद्दा असला तरी सध्याच्या घडीला देशातील तरुण रोजगार मिळण्यासाठी धडपडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच एका मुलाखतीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या आकडेवारीचा दाखला देत संघटीत क्षेत्रात गेल्या एका वर्षात ७० लाख बेरोजगारांना रोजगार दिल्याचे सांगितले. पण देशाच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या ताज्या आकडेवारीनुसार तब्बल २३ लाख लोकांना मागील दहा महिन्यांत आपला रोजगार गमवावा लागला आहे, अशी माहिती पुढे आली आहे.

२३ लाख ४७ हजार कामगार सप्टेंबर २०१७ ते जून २०१८ या दहा महिन्यात कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्याचे कमी झाले आहेत. तर याच दहा महिन्यात कामगार भविष्य निर्वाह निधी महामंडळात ४७.१३ लाख नवे खातेदार वाढले आहेत, अशी माहिती सांख्यिकी मंत्रालयाच्या वेतन अहवालात पुढे आली आहे. यावरून देशातील रोजगारासंदर्भात असलेल्या आकडेवारीतील तफावत दिसून आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी महामंडळ, कर्मचारी राज्य विमा महामंडळ आणि राष्ट्रीय पेन्शन योजना या तीन संस्थाच्या लाभार्थ्यांच्या आकडेवारीवरून सांख्यिकी मंत्रालयाने जून २०१८ साठी वेतन अहवाल तयार केला आहे. संघटीत क्षेत्रातील रोजगाराच्या आकडेवारीतील तफावत या अहवालामध्ये दिसून येत आहे. फक्त प्राथमिक रोजगाराची माहिती या अहवालातून कळत असून एकाच वेळी अनेक ठिकाणी लाभार्थ्यांची माहिती दिसत असल्यामुळे ही तफावत दिसून येते. अचूक माहिती मिळण्यासाठी माहिती संकलन करण्याची अधिक चांगली पद्धत शोधण्याची गरज असल्याचे सांख्यिकी मंत्रालयने स्पष्ट केले आहे.

Leave a comment

0.0/5