पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या राजकोट एम्सच्या पायाभरणी कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी सूचक भाष्य करत कोरोना लस आणि कोरोना विषयी घेण्यात येणाऱ्या कायजी विषयी सूचक भाष्य केले आहे.
‘आधी मी म्हणत होतो की जेव्हापर्यंत औषध नाही तेव्हापर्यंत निष्काळजीपणा नाही, आता आपला २०२१ चा मंत्र असेल औषधही आणि काळजीही, असं म्हणत नव्या वर्षात आशेचा किरण दिसत असल्याचं म्हटलं आहे. २०२० आरोग्याच्या बाबतीत अभूतपूर्व वर्ष ठरल्याचं यावेळी पंतप्रधानांनी म्हटलंय. सोबतच आरोग्य हीच संपदा असल्याची शिकवण या वर्षाने दिल्याचेही पंतप्रधांन नरेंद्र मोदी यांनी नमूद केले आहे.
नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच देशात मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत होणार आहे. राजकोटमध्ये एम्सच्या शिलान्यासाने संपूर्ण गुजरातसहीत देशाचे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणाला बळ मिळेल. सरत्या २०२० या वर्षाला एका नव्या राष्ट्रीय आरोग्य सुविधेसोबत निरोप देणं, हे या वर्षातलं आव्हानंही दर्शवतं तसेच नव्या वर्षाची प्राथमिकताही अधोरेखित करतं, असेही यावेळी मोदींनी म्हटले आहे.