‘काँग्रेस-राष्ट्रवादीने गुरांच्या छावण्या आणि त्यांच्या शेणातही भ्रष्टाचार केला. उद्या शरद पवार इथे आले तर त्यांना सांगा शेण खाणारी राष्ट्रवादीसारखी औलाद आमच्याकडे नको. आम्हाला जाहिरातीमधून विचारतायत, लाज वाटते का म्हणून, आधी हे तुमच्या भ्रष्टाचाराचे पुस्तक वाचा आणि तुम्हीच सांगा लाज वाटते का ते ’काँग्रेस-राष्ट्रवादीमधील हे दरोडेखोरच आता ‘चोर, चोर’ अशी बोंब ठोकत आहेत असा टोला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी पक्षाला लगावला आहे. तुफानी वादळातही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परभणीच्या स्टेडियम मैदानावर आयोजित सभा सोमवारी तुफान यशस्वी झालेली दिसून येत होती.
या सभेला उद्देशून बोलताना ते म्हणाले की, निसर्ग आज आपली परीक्षा बघतो आहे. देशाचीही सध्या परीक्षाच सुरू आहे. पण आज इथे उठलेले हे युतीचे वादळच उद्या दिल्लीचे तख्त काबीज केल्याशिवाय राहणार नाही’ असा जबरदस्त आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्ती करताच जमलेल्या कार्यकर्त्यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’चा प्रचंड जयघोष करून युतीच्या विजयावर जणू शिक्कामोर्तबच केला. परभणीतील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार संजय ऊर्फ बंडू जाधव यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन परभणीच्या स्टेडियम मैदानावर करण्यात आले होते.
विरोधकांनी कितीही आघाडय़ा केल्या, कितीही सभा घेत ते महाराष्ट्रात फिरले तरी भगव्याचा हा जल्लोष ते कुठून आणणार आहेत? तुफानातही न डगमगता जागेवर बसून असलेल्या शिवसैनिक आणि गर्दीचे कौतुक करताना उद्धव ठाकरे म्हणाले, आता मी भिजलो तरी इथून हलणार नाही. एकदा साथसोबत द्यायचं वचन दिले म्हणजे दिले. ऊन, वारा, पावसातही मी तुमच्यासोबत राहणार. ही साथ सोबत आणि हे वादळच उद्या दिल्लीचं तख्त काबीज केल्याशिवाय राहणार नाही. आता निवडणुका आल्यावर शरद पवारांना दुष्काळ आठवला आहे अशी टीका करून उद्धव ठाकरे म्हणाले, गेली पाच वर्षे महाराष्ट्रात दुष्काळाच्या वेळी आमचा शिवसैनिक शेतकऱयांना मदत करत होता, शेतकरी कन्यांचे विवाह लावत होता तेव्हा शरद पवार कुठे होते? आज निवडणुकीच्या काळात गुरांच्या छावणीला भेट दिल्याचे फोटो छापून आणतात. पण हे काम निवडणुका नसतानाही माझा शिवसैनिक करत होता. असे सुद्धा बोलून दाखविले.