लोकसभा निवडणुकी नंतर आता राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची बैठक मुंबई येथे पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. तर विधानसभा निवडणुकीत मनसेला महाआघाडीत घेण्याबाबत सर्वांनीच सहमती दर्शवली.
विधानसभा निवडणुकीत सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे असे मत काँग्रेस राष्ट्रवादीसह स्वाभिमानीचे राजू शेट्टी आणि सपाचे आमदार अबू आझमी यांनी मांडले. यावेळी राज ठाकरे यांना महाआघाडीत घ्यावं असे बैठकीतील अनेक मंडळींनी सुचवले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मनसेला आघाडीत घेण्यासाठी विरोध दर्शवला होता. मात्र आता राज्यातील धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावं असा विचार या बैठकीत मांडण्यात आला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीला देखील महाघाडीत घेण्याचा विचार या बैठकीत मांडण्यात आला.