मानवाधिकार आयोग म्हणजे काय याची परिभाषा लोकांना अजून समजलेली नाही. मानवाधिकाराची भाषा आपण जेव्हा उच्चरवाने करतो त्या वेळी या मानवाधिकाराचे उल्लंघन झाले ते कश्मिरी पंडितांचे. ३० वर्षांपूर्वी जुलूम जबरदस्ती करून कश्मिरी पंडितांना कश्मीरच्या खोर्यातून हुसकावून लावण्यात आले.
त्यांचे पुनर्वसन करणे हाच खरा मानवाधिकार ठरेल. त्यामुळेच कश्मिरी पंडितांचे पुनर्वसन होईपर्यंत मानवाधिकार आयोगात कश्मिरी पंडितांचा प्रतिनिधी नेमा. त्याचबरोबर देशात नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने फतवे काढले जातात. ती फतव्यांची मुजोरी मोडीत काढा, अशी आग्रही मागणी आज शिवसेनेने केली.
राज्यसभेत मानवाधिकार संशोधन विधेयकावर झालेल्या चर्चेत सहभागी होताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या विधेयकाला समर्थन देत शिवसेनेची सडेतोड भूमिका मांडली. आपल्या देशात आपण भटक्या कुत्र्यांना मारू शकत नाही, मात्र मानवाची पर्वा करत नाही. मानवाधिकार हा राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे.