मुख्यमंत्री सर्वोत्कृष्ट ठरल्याने फडनवीसांना खटकले! – मंत्री हसन मुश्रीफ.
कोरोनाच्या वाढत्या संकटात महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये खटके उडताना अनेकदा पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या संकटात भाजपाने ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याचा एकही मौका सोडलेला नाही आहे. त्यातच आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फडनवीसांना खोचक टोला हाणला आहे.
कोकणात निसर्ग चक्रीवादळासाठी १०० कोटी रुपयांची मदत अतिशय तोकडी आहे. राज्य सरकारची अवस्था धोरण लकव्याची सुद्धा आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली होती. त्यावर हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिले आहे. “नुकसानीच्या दिवशीच मुख्यमंत्री ठाकरे यांनी पाहणी करून विजेचे ट्रान्सफॉर्मर आणि जनतेच्या अत्यावश्यक सेवांसाठी तात्काळ मदत म्हणून १०० कोटी रुपये जाहीर केले होते. तसेच तातडीने पंचनामे करू आणि जेवढे नुकसान झाले असेल ते सर्व नुकसान सरकार देण्याचा प्रयत्न करेल, असेही त्यांनी जाहीर केले होते”. तरीही फडणवीस टीका करीत असून, हा हास्यास्पद प्रकार असल्याचे मुश्रीफ यावेळी म्हणाले.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, चीन, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही सप्टेंबरपर्यंत कोरोनावर लस येणार असल्याचे जाहीर केले. या लसीमुळे कोरोना संपुष्टात आला तरी देवेंद्र फडणवीस काय म्हणतील, हे सांगता येत नाही. पंधरवड्यापूर्वी माझे मित्र देवेंद्र फडणवीस यांना ‘मौनम् सर्वार्थ साधनम्’, ‘मौन व्रतामुळे शांती लाभते’ आणि ‘प्रतिकूल परिस्थितीत अध्यात्म हाच उपाय’ अशी तीन महत्त्वाची पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला होता. ज्यामुळे ते वैफल्यग्रस्त मनस्थितीतून बाहेर येऊन, त्यांचे मन:स्वास्थ्य ठीक राहील अशी अपेक्षा होती, पण त्यांनी ती पुस्तके वाचलेली दिसत नाहीत. त्यांनी माझा सल्ला धुडकवला आहे, अशी मिश्किलीही मुश्रीफ यांनी यावेळी केली.