जेएनयू मधील हिंसाचाराला मोदी आणि शहा जबाबदार – जितेंद्र आव्हाड
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा आता जवाहरलाल नेहरु विद्यालयात विद्यार्थ्यांच्या बुद्धिमतेला घाबरत आहेत. जेव्हा विचारसरणी किंवा बुद्धिमतेला सरकार घाबरतं तेव्हा देशात अराजकता येण्याची शक्यता असते’, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. जवाहरलाल नेहरु विद्यालय परिसरात झालेल्या हिंसाचाराचा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र शब्दात निषेध केला. जेएनयू येथे घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे काही विद्यार्थी संघटनांनी आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनात देखील मंत्री जितेंद्र आव्हाड सहभागी झाले.
‘विद्यार्थी शांतपणे बसले आहेत. हे महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत. ते गांधीवादी आहेत. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. जे काही जेएनयूमध्ये झाले ते माणुसकीला धरुन नव्हते याच्यामध्ये कुणाच्याही मनात शंका असता कामा नये. सरकार कुणाचं आहे? याच्यापेक्षा माणुसकी सर्वांच्या मनात असते आणि आपण माणुसकीला धरुन चालतो. त्यामुळे जेएनयूमध्ये जे झालं त्याचा आम्ही निषेध करतो’, असं आव्हाड म्हणाले. ‘हे विद्यार्थी शांतपणाने आंदोलन करत आहेत. त्यांचे मी कौतुक करतो आणि त्यांच्या भावना मी सरकारपर्यंत घेऊन जाणार आहे’, असं देखील ते म्हणाले.
मोदी सरकारला याबाबत दोषी का ठरवलं जात आहे? याबाबत आव्हाड यांना प्रश्न विचारला असता, ‘शेवटी दिल्लीमध्ये पोलीस कुणाचे आहेत? दोष त्यांच्यावरच येईलना? उद्या मुंबईत काही झालं तर दोष कुणावर येईल? ज्यांचे पोलीस आहेत, त्यांच्यावर येणार. त्यामुळेच मला या विद्यार्थ्याचं कौतुक वाटतं की एवढं सारं होऊनसुद्धा शांतपणे आंदोलन करत आहेत’, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
‘यावर काही कारवाई होणार नाही. डोळ्यासमोर दिसत आहे. काय झालं ते डोळ्यासमोर दिसल्यानंतर तुम्हीच त्याचं अवलोकन करु शकतात. जनता बघू शकते काय झालं ते. माझ्या घरात दरोडा पडला आणि दरोडेखोराने जाऊन सांगितलं की यांनी मला घरात घेऊन जाऊन मारलं तर तू घरात आला कशाला होता? प्रश्न असा निर्माण होतो’, असं देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.