मुंबई तसेच मुंबईच्या आसपासच्या शहरांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. त्यात वाढत असलेली रुग्णसंख्या मनपाच्या अडचणी अधिक वाढवताना दिसत आहे. त्यातच आता कल्याण डोंबिवली हद्दीतील ७० टक्के रुग्ण हे इमारतीमधील रहिवाशी आढळून आले आहेत.
सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये १५४० रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली मनपाचा आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे. तसेच रुग्णसंख्या रोखण्यासाठी नियम अधिक कडक करण्यात आले आहे. एका इमारतीमध्ये जर ५ ते १० रुग्ण आढळयावर ती संपूर्ण इमारत सील करण्यात येत आहे.
आता पर्यंत कल्याण डोंबिवलीमध्ये १० ते १२ इमारती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सील करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती आरोग्य विभागाच्या प्रमुख प्रतिभा पाटील यांनी दिली आहे. या संदर्भात बोलताना पाटील म्हणाल्या की, जी स्टॅटर्जी आम्ही ठरवली आहे त्या प्रमाणे एका इमारती मध्ये पाच पेक्षा अधिक रुग्ण आढल्यावर आपण ती संपूर्ण इमारत सील करतो. साधारण १० ते १२ इमारती आता पर्यंत आपण सील केल्या आहेत अशी माहिती आरोग्य अधिकारी पाटील यांनी दिली आहे.