संसदेत अधिक प्रश्न विचारल्या बद्दल महाराष्ट्रातील मावळचे खासदार मा. श्रीरंग बारणे यांना सलग पाचव्यांदा चेन्नई येथील पंतप्रधान पॉइंट फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेकडून पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांची संसदेतील कामगिरी पहिली असता त्यांनी १०७६ विविध प्रश्न संसदेत मांडले असून, २८९ वेळा चर्चेत सहभाग घेतला आहे. त्यांची सभागृहात ९३ टक्के उपस्थिती नोंदवली गेली आहे. तामिळनाडू येथील राजभवनात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी लोकसभेतील उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. खासदारांची संसदेतील कामगिरी त्यांचा विविध चर्चांमधील सहभाग, उपस्थित केलेल्या प्रश्नांची संख्या, खासगी सदस्य विधेयक संख्या, सभागृहातील उपस्थिती या संदर्भात पीआरएस इंडियाने दिलेल्या आकडेवारी वरुन कामगिरीचा आढावा घेऊन लोकसभा सचिवालया मार्फत पुरवलेल्या माहितीवरुन याचे मूल्यांकन निवड समितीमार्फत केले जाते.
सलग पाचव्यांदा पुरस्कार भेटणारे शिवसेना खासदार मा. श्रीरंग बारणे हे महाराष्ट्रातील एकमेव खासदार आहे. लोकसभेच्या ५४५ खासदारांच्या कामकाजाचे मूल्यांकन केले असता मावळ तालुक्याचे खासदार मा. श्रीरंग बारणे यांचे कामकाज लोकसभेत लक्ष्यवेधी ठरले आहे. या पुरस्कार निवड समितीत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन मेघावाल, शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते आनंदराव अडसूळ यांचा समावेश आहे.