रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणाचा वाद मध्यस्थाच्या मार्फत सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.
सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती खलीफुल्ला हे या समितीचे प्रमुख असतील. तर सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर हे मध्यस्थाची भूमिका बजावतील.
तीन सदस्यीय समितीला पुढच्या आठ आठवड्यात आपला रिपोर्ट सुप्रीम कोर्टासमोर सादर करावा लागणार आहे. तसंच समितीतील सदस्यांनी या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी जी काही चर्चा होईल ती गोपनीय ठेवण्याचा आदेशही सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
मध्यस्थीसाठी आणखी काही लोकांची गरज असेल तर समिती तशी मागणी करू शकते. त्यांना परवानगी देण्यात येईल, पण या तोडगा समितीचे हे तीन प्रमुख सदस्य असतील.
कोण आहेत न्या.खलीफुल्ला?
न्या.खलीफुल्ला यांचं पूर्ण नाव फकीर मोहम्मद इब्राहीम खलीफुल्ला असं आहे. 67 वर्षांचे न्या. खलीफुल्ला यांचा जन्म 23 जुलै 1951 मध्ये तामिळनाडूतील कराइकुडी इथं झाला.
- बाबर ते योगी ते श्री श्री: अयोध्येत आजवर काय काय घडलं?
- जेव्हा बाळासाहेब ठाकरे बोलले होते, ‘राम मंदिराच्या जागी मंगल पांडेंचं स्मारक करा’
1975 पासून ते वकिलीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. 2000 साली त्यांना मद्रास हायकोर्टात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्यात आलं. 2011 मध्ये त्यांना जम्मू काश्मीर हायकोर्टात न्यायमूर्ती म्हणून नियुक्त केलं. सप्टेंबर 2011 पासून ते जम्मू काश्मीर हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम करत होते.