राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या गोरगरीब जनतेला हक्काचा निवारा मिळण्यासाठी विविध योजना अधिक गतिमान करून घरकुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत “महाआवास ग्रामीण अभियान” राबविले जाणार आहे.
राज्यात सध्या अपूर्ण असलेली घरकुले तसेच अद्याप मान्यता न दिलेल्या घरकुल प्रस्तावांना मान्यता देऊन या ११० दिवसात ८ लाख ८२ हजार १३५ घरकुले पूर्ण करण्याचा निर्धार राज्य सरकारतर्फे करण्यात आलेला आहे, अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, राज्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्फत विविध योजना राबिवल्या जातात. प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदीम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, ग्रामीण भागातील शासकीय जागांवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकुल करण्यासाठीची योजना यांमधून ग्रामीण नागरिकांना घरे देण्यात येत आहेत, असे मुश्रीफ यांनी बोलून दाखविले.