लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला उतरती कळा लागलेली आहे. काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळेच राज्यात काँग्रेस पक्षावर पराभवाचे चिन्ह निर्माण झलेला आहे. काही दिवसापूर्वी सुजय यांनी काँग्रेस पक्षाला राम-राम ठोकत भाजपा पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर रणजितसिंह मोहिते-पाटील, अब्दुल सत्तार, प्रतीक पाटील यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी दिलेली आहे. त्यात राहुल गांधी यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदावरून संजय निरुपम यांना काढून त्या जागी माजी मंत्री मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेस अध्यक्ष पद देण्यात आलेले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात निरुपम आणि देवरा यांच्यातील वादाचा फटका काँग्रेस पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत बसू शकतो असे बोलण्यात येत आहे.
चंद्रपूर मतदारसंघातील नाराजीमुळे जाहीर केलेला उमेदवार काँग्रेसला बदलावा लागला आहे. संभाजीनगर मध्ये पक्षाच्या ज्येष्ठ आमदारानेच बंडाचा झेंडा उगारला आहे. तर रामटेकमध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी झाली आहे. त्याआधी विरोधी पक्षनेत्याच्या मुलानेच भाजपात प्रवेश केल्याने पक्षात उत्साह कमी झालेला दिसून येत आहे. भाजपाचा मुकाबला करण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनीच लोकसभा निवडणूक लढवणार नाही असा पावित्रा घेतला होता. या गोंधळात काँग्रेसला राज्यात लोकसभा निवडणुकीला सामोर जावे लागणार असल्याने काँग्रेस नेत्यांनाच पराभवाची धास्ती लागून राहिली आहे.
सोमवारी लोकसभा निवडणूक २०१९ च्या महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे दोन-दोन उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झाले आणि काँग्रेसमधला गोंधळ चव्हाट्यावर आला. काँग्रेस नेते किशोर गजभिये आणि नितीन राऊत या दोन्ही नेत्यांनी आपणच काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असल्याचे सांगत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सध्या काँग्रेस पक्षात कुठे मतदार संघात उमदेवार भेटत नाही तर कुठे मतदार संघात एका पेक्षा अनेक काँग्रेस उमेदवार इच्छुक असताना दिसून येत आहे.