राजस्थान मध्ये घडत असलेल्या राजकीय घडामोडीवर सामनातून भाष्य
एकीकडे देशावर कोरोनाचे संकट गहिरे होत असताना दुसरीकडे राजस्थान सरकारमध्ये सत्तापालटाचे चित्र दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचे रणशिंग फुकलेले दिसून येत आहे. यावर आता शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून सचिन पायलट आणि भाजपावर निशाणा साधण्यात आलेला आहे.
अग्रलेखात म्हंटले आहे की, पायलट यांची महत्त्वाकांक्षा राजस्थानचे मुख्यमंत्री बनण्याची आहे. ते आता उपमुख्यमंत्री व राज्य काँगेसचे अध्यक्ष आहेत. ते तरुण आहेत व भविष्यात त्यांना संधी आहे, पण गेहलोत द्वेषाने पछाडल्यामुळे त्यांना भविष्यापेक्षा वर्तमानातच मोठा झगडा करून मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवायची आहे. हे त्यांचे पाऊल आत्मघातकी ठरेल.
पुढे लिहिताना राऊत लिहितात की, मोदी व शहा यांनी प्रचंड यंत्रणा राबवून, झंझावात निर्माण करूनही राजस्थानात भाजपला सत्ता मिळाली नाही. लोकांचा कौल काँगेसच्या बाजूने होता. पायलट यांनी या विजयासाठी मोठी मेहनत घेतली हे मान्य, पण आज पक्ष संकटात असताना बोटीतून उडी मारणाऱया उंदराप्रमाणे वागून त्यांनी स्वतःला कलंकित करून घेऊ नये. आमदारांच्या घोडेबाजारप्रकरणी स्पेशल ऑपरेशन ग्रुपने सचिन पायलट यांना एक नोटीस पाठवली व पायलट यांच्या संयमाचा अंत झाला. हे सर्व गेहलोत यांनी घडवून आणले असा पायलट यांचा आरोप आहे, पण अशीच नोटीस खुद्द मुख्यमंत्री गेहलोत यांनाही पाठवली आहे