सिनेअभिनेत्री कंगना रनौत हिच्या मणिकर्णिका या मुंबई स्थित कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर बृहन्मुंबई महानगर पालिकेने हातोडा चालवला होता. या कारवाईच्या विरोधात कंगनाने कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. आता या संबंधित निर्णय देताना कोर्टाने कंगनाच्या कार्यालयावर मनपाने केलेली कारवाई अवैद्य ठरवत मनपाला खडेबोल सुनावले आहे, यावर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांवर प्रतिक्रिया दिलेली आहे.
कंगनाच्या कार्यालयावर जी कारवाई झाली ती एमएमसी कायद्यानुसार झाली आहे. अनधिकृत बांधकाम सुरू असताना ३५४ अ अंतर्गत २४ तास अगोदर नोटीस दिली होती, असे त्यांनी वृत्तमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहे. कारवाई सुडापोटी केली असेल तर मग त्या नटीने पीओके म्हणून जो अपमान मुंबईचा केला, त्यावर कुठल्या कोर्टात दाद मागायची ?, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
एमएमसी कायद्यानुसार कारवाई करा असे कोर्टाने यापूर्वी अनेकदा सांगितले आहे. मग कंगना प्रकरणात काय उणिवा राहिल्या ? त्या पाहू, असे त्या म्हणाल्या. कोर्टाच्या निर्णयावर बोलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.