सतत वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रनौतला पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी समन्स पाठवला आहे. ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणी जुहू पोलिसांकडून हा समन्स बजावण्यात आलेला आहे.
शुक्रवारी मुंबई पोलिसांनी जुहू पोलीस स्टेशनमध्ये कंगनाला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ज्येष्ठ कवी आणि बॉलिवूडमधील ज्येष्ठ पटकथाकार जावेद अख्तर यांनी कंगनावर मानहानीचा दावा केला आहे. डिसेंबर २०२० मध्ये जावेद अख्तर यांनी अंधेरी न्यायालयात मानहानीचा दावा केला होता.
न्यायालयाने जुहू पोलिसांना याप्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. १६ जानेवारीला रिपोर्ट देण्याचे कोर्टाचे आदेश होते. मात्र जुहू पोलिसांनी वेळ मागून घेतल्यामुळे ही मुदत १ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली होती. टेलिव्हिजन मुलाखतींमध्ये रानौत हिने जावेद अख्तर यांच्याविरूद्ध बदनामीकारक टीका केल्याप्रकरणी जावेद अख्तर यांनी हे तक्रार दाखल केली होती.