राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामीण जनतेला पक्की घरे देण्यासाठी तसेच घरकुल योजनांना चालना देण्यासाठी ग्रामविकास विभाग, आयआयटी (मुंबई) तसेच रिलायन्स फाउंडेशन यांच्यामध्ये भागीदारी झाल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले की, राज्यात स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार घरकुल डिझाईन करणे, कमी खर्चातील पण दर्जेदार अशा घरकुलाचे तंत्रज्ञान विकसीत करणे तसेच भूकंप, वादळ आदी नैसर्गिक आपत्तींचा सामना करू शकणाऱ्या घरकुलांची निर्मिती करण्यासाठी आयआयटी-मुंबई यांची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
तसेच आयआयटीच्या माध्यमातून ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आयआयटी ही देशातील अग्रगण्य आणि नामांकित संस्था असून त्यांच्या सहयोगातून ग्रामीण भागातील घरकुले अधिक दर्जेदार होण्यास मदत होईल असे मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.