कलम ३७० हटवलं, शिवसेना भवन समोर तिरंगा आणि भगवा फडकावत शिवसेनेचा जल्लोष
काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ ए हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने आज घेतला. गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलेल्या प्रस्तावावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली. देशाच्या आणि काश्मीरच्या इतिहासातील ही ऐतिहासिक घटना आहे. काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा आता रद्द झाला आहे. देशभर याबाबत आनंद व्यक्त केला जातोय. शिवसेनेची ही मागणी आज पूर्ण झाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न आज पूर्ण झाल्याची भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे. आज भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. याचं औचित्य साधून शिवसेना भवन या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर भगवा आणि तिरंगा फडकावत जल्लोष साजरा करण्यात आला.
शिवसेना भवन येथे जमलेल्या शेकडो शिवसैनिकांनी ढोल ताशाच्या गजरात जल्लोष केला. यावेळी शिवसेनेतर्फे पेढेवाटप करून आनंद साजरा केला गेला. शिवसेना भवन परिसर जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणांनी दुमदुमून गेला. विशेष म्हणजे या जल्लोषात महिला आघाडीवर दिसल्या. उपस्थित महिलांनी हातात भगवा आणि तिरंगा घेऊन मोठ्या जल्लोषाने तो उंचावून घोषणाबाजी केली. जमलेल्या प्रत्येकालाच तिरंगा आणि भगवा हातात घेऊन आनंद व्यक्त करण्याची ईच्छा होती. शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत आपला आनंद व्यक्त केला.
आठ दिवसात मोफत बस देण्याचा शब्द आदित्य ठाकरेंनी चारच दिवसात केला खरा