टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): दमट वातावरण त्यात भारनियमनामुळे हैराण झालेले नागरीक, विजेच्या कडकडाटाने सुरू झालेल्या पावसाने पाणीच पाणी करून टाकले. हा वळवाचा पाऊस रात्रभर सुरू होता, सकाळी ओढ्यानाल्याला पूर तर पाण्याने भरलेल्या विहिरी दिसू लागल्या.
ज्वारीचे पिक पाण्यावर तरंगत होते. या पावसाने एकीकडे बळीराजा सुखवला असला तरी शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात ज्वारीच्या पिकाचे नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत होते.
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी, मलठण, आमदाबाद, कवठे येमाई, सविंदणे, चांडोह, फाकटे, जांबूत या परीसरात मध्यरात्री जोरात पाऊस झाला. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले होते.
https://maharashtrabulletin.com/akhil-mandai-ganapati-mandal-pune/
या पावसाने शेतकऱ्यांची धांदल उडाली होती. शेतात ज्वारीची कणसे कापून ठेवल्याने ती पाण्यात तंरगताना दिसत होती. काही शेतकऱ्यांनी धान्य झाकून ठेवले होते. त्यांचे देखील धान्यात पाणी घुसल्याने सकाळी ते धान्य वाळविण्यासाठी लगबग सूरू होती.
या पावसाने बाजरीचे पिक भिजल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. हा पाऊस उस पिकासाठी पोषक ठरणारा आहे. डाळींब बागांना या पावसाने फटका बसण्याची शक्यता आहे.
जलसंधारणाची कामे केल्याला ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. ओढ्यानाल्यांना पूर आल्याने रस्त्यांवर पाणी आले होते. सध्या हवामान दमट असल्याने एकंदर पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
रस्त्याच्या कडेला व शेतांमध्ये पाणी पाणी दिसू लागले होते.