सोलापूर लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी घेतलेली भेट वेगळ्याच वळणावर गेलेली दिसून येत आहे. त्यांच्या भेटीचे छायाचित्र समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाले अन् नसत्या चर्चांना उधाण आले आहे. त्यावर संतापून प्रकाश आंबेडकर म्हणाले, “काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे. भेटीच्या फोटोबद्दल असा गाढवपणा होईल, असे मला वाटलंच होते. भेटीचे राजकारण करणे काँग्रेसवाल्यांना चांगलेच जमते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ते सोलापुरात अभिवादन करण्यासाठी प्रकाश आंबेडकर सोलापुरात आले होते.
काही दिवसापूर्वी सोलापुरातील एक हॉटेल मध्ये प्रकाश आंबेडकर सकाळची न्याहारी करताना त्या जागी काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे हे सुद्धा आले होते. त्या नंतर त्या दोघांनी सुद्धा एकत्र नाश्ता केला तेथील उपस्थित असलेल्या काँग्रेस कार्यकत्यांनी त्या दोघांचे फोटो काढले होते आणि ते फोटो प्रसार माध्यमावर तसेच सोशल मीडियावर सुद्धा टाकण्यात आलेले होते. या बद्दल जेव्हा प्रकाश आंबेडकरांना विचारण्यात आले तेव्हा आंबेडकर म्हणाले, “राजकारणात भेटी-गाठी होत असतात. त्याबद्दल दुमत नाही. परंतु या भेटीचेही राजकारण करणे चुकीचे असते. त्याला काँग्रेसवाले डावपेच म्हणतात. कुठून तरी भेट घ्यायची. त्याचे छायाचित्र काढून घ्यायचे आणि मग ते चहूकडे व्हायरल करून टाकायचे. त्यानंतर शेवटी म्हणायचे, ‘अरेरे हे असं झालं, ते तसं झालं. काँग्रेसचे हे घाणेरडे राजकारण आहे. निवडणुकीत शेवटी लोकच ठरवणारे असतात. अशा घाणेरड्या राजकारणाला लोकच धडा शिकवतील” असेही आंबेडकर या वेळी म्हणाले.