लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्याच्या मतदाना नंतर प्रसार माध्यमांनी जाहीर केलेल्या एक्सझिट पोलच्या सर्वे नुसार पुन्हा एकदा देशात भाजपा बहुमताने येणार असा निकाल दाखविण्यात येत आहे. यात महाराष्ट्रात सुद्धा भाजपा-शिवसेना पक्षाच्या जागा वाढतील असे सुद्धा एक्सझिट पोलच्या सर्वेक्षण नुसार सांगण्यात आले आहे. परंतु साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या बारामती मतदार संघात यंदा कमळ फुलणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
जनतेनेच आम्हाला पाठिंबा दिल्यामुळे या निवडणुकीत आमचा विजय निश्चित असल्याचा विश्वास भाजपा उमेदवार कांचन कुल यांनी व्यक्त केला आहे. विरोधी उमेदवार आम्हीच जिंकणार असे आत्मविश्वासाने सांगतात. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ईव्हीएमवर अविश्वास दाखवतात ही विचार करण्यासारखी बाब असल्याचा टोला लगावत, आता कुठे गेला विरोधी उमेदवारांचा आत्मविश्वास असा सवालही कांचन कुल यांनी उपस्थित केला.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार कांचन कुल यांनी आज बारामतीतील सिद्धेश्वर मंदिरात जाऊन सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपल्याला सिद्धेश्वराकडून कौल मिळालाय आणि जनताही आपल्या पाठीशी असल्याने आपला विजय निश्चित असल्याचे सांगितले. विरोधी उमेदवार विजय निश्चित असल्याचं सांगतात. त्याचवेळी शरद पवार हे ईव्हीएमवर अविश्वास दाखवतात. त्यावरुनच विरोधी उमेदवारांचा आत्मविश्वास काय तो कळतो असंही कांचन कुल म्हणाल्या