लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आपल्या पराभवाचे खापर वंचित बहुजन आघाडीवर फोडले आहे. वंचित आघाडीने आमच्या विरोधात उमेदवार उभे करून कुठेतरी भाजपाला फायदा पोहचेल अशी परिस्थिती राज्यात निर्माण केली होती. असे आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लावलेले होते. परंतु प्रकाश आंबेडकरांनी यांचे स्पष्टीकरण देताना सांगितले की, वंचित बहुजन आघाडीला मिळालेली मतं काही ठिकाणी जास्त होती तर काही ठिकाणी कमी होती.
त्यातच जवळपास ४० लाखांहून अधिक मतदान वंचितला झाले होते. वंचितमुळे आघाडीचे उमेदवार पडले असा आरोप आमच्यावर होतो. वंचित बहुजन आघाडी भाजपाची बी टीम आहे असे काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं आहे तर त्यांनी आम्हाला पुरावे द्यावेत असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला लगावला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते.