येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि जास्तीत-जास्त जागा निवडून आणण्यासाठी राज्यातील छोट्या-मोट्या पक्षांचा सहारा घेताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीला वंचित आघाडी सोबत न आल्यामुळे या दोन्ही पक्षाला महाराष्ट्रात मोठी किंमत चुकवावी लागली होती.
त्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी वंचितला भाजपाची “बी” टीम असल्याचे बोलून येणाऱ्या विधानसभेला स्वतःच्या पायावर दगड मारून घेतला होता. त्यातच आता अजून एक काँग्रेसचा मित्र पक्ष असलेला गवई गट विधानसभेला स्वतंत्र लढणार असल्याचे बोलून दाखवत आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला काँग्रेस राष्ट्रवादीच्या अडचणीत वाढ होण्याचे चिन्ह दिसून येत आहे.
‘विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला सन्मानजनक वागणूक द्यावी. आम्हाला कमीत-कमी 10 जागा हव्या आहेत. या जागा न दिल्यास आम्ही 50 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवू,’ असा इशारा रिपाइंचे (गवई गट)नेते राजेंद्र गवई यांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणींत भर पडली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीतून धडा घेऊन काँग्रेसने विधानसभेच्या तयारीला सुरुवात केली आहे.